बौध्द धम्माच्या बाबतीत पसरविण्यात येणारे गैरसमज : भाग ४
- Get link
- X
- Other Apps
©2014 By www.buddhistsofindia.blogspot.in You may copy anything else from this Blogspot, But : 1. You should mention the source of an article or text from where you copied it. 2. Don't use any article to make money in any respect . otherwise All Rights resereved
▼
रविवार, २४ सप्टेंबर, २०१७
बौध्द धम्माच्या बाबतीत पसरविण्यात येणारे गैरसमज : भाग ४
सध्या अनेक उदाहरणांचे दाखले देत तसेच अनेक गैरसमजुतींनी परिपूर्ण अशी एक पोस्ट सोशल मिडिया च्या माध्यमातून फिरत आहे. ज्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेला बौध्द धम्म आणि विदेशी बौध्द धम्म कसा एकमेकांच्या पासून वेगळा आहे, हे समजाविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या लेखामध्ये बाबासाहेबांच्या नावाखाली त्यांनी दिलेल्या अनेक संदर्भांनाच नाकारून त्याविरुद्धच प्रश्न उभे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक लोक सदर संदर्भांची शहानिशा न करताच त्या लेखातील संदेशाला बळी पडत आहेत, त्यामुळे सदर लेख लिहित आहेत. सदर लेखाला प्रत्युत्तर देण्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीची चेतावणी देतो कि, सर्वप्रथम आणि विदेशातील बुध्द आणि भारतातील बुध्द असा भेद करणे सोडले पाहिजे. काही लोक विनाकारण असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु त्याच्या दुष्परिणामांना विसरतात. भारतामध्ये एक विशिष्ट समाज आणि त्याच्या संगठना कायमच असा प्रचार करीत आले आहेत कि, बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुध्दाचा मूळ पारंपारिक बुध्दांशी जराही संबंध नसून तो केवळ त्यांच्या कल्पनेतून आलेला असून त्यांनी त्याद्वारे आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अशाप्रकारे लिखाण करून आपण त्यांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारालाच हातभार लावत आहोत असे आपल्याला वाटत नाही का..? अशा प्रकारचा भेद निर्माण केल्यामुळे जी काही पोकळी निर्माण होते ती अनेक विरुद्ध विचारी संघटनांच्या द्वारे अतिक्रमण करून भरून घेतली जाते. आपण सर्वांनी यावर अवश्य विचार करावा.
सदर लेखामध्ये लेखकांनी अनेक प्रकारे बौध्द मतांचे खंडन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुध्दा दि बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथांच्या नावावर. कारण त्यांनी ज्या काही मुद्यांचे खंडन केलेले आहे, त्याचे अनुमोदन बाबासाहेबांनी बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये केलेलं आहे, त्यामुळे सदर लेखकाला उत्तर मी दि बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथातील संदर्भाच्या द्वारेच देतो.
१. सर्वप्रथम लेखक जातक कथांना थोतांड म्हणतो, तसेच ज्या धम्मा मध्ये जातक कथा आहेत, तो आध्यात्मिक बुध्द असून त्याचा बाबासाहेबांच्या क्रांतिकारी बुध्दांशी जराही संबंध नाही असा लेखकाचा दावा आहे. त्यांना मी एवढे म्हणू इच्छितो की, जातक सिद्धांत हा बाबासाहेबांचा आवडता सिद्धांत होता - इतका की, त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या सिद्धांताला जगातील कोणत्याही शासनामध्ये तोड नाही.
काही लोक ह्या बोधीसत्त्व संकल्पनेचा संबंध अवतार वादाशी लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात -
बोधीसत्वांच्या अनेक जन्मांचा किंवा जातकांचा हा सिध्दान्त ब्राह्मणांच्या अवतारवाद ह्या सिध्दांतासारखा वाटतो, अर्थात ईश्वराच्या अवतारासंबंधीचा सिध्दान्त. (पण तसे नाही, त्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे) जातक सिध्दान्त हा भगवान बुध्दांच्या सर्वश्रेष्ठ शुध्द अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. यामध्ये बोधीसत्वाचे जीवन शुध्द असलेच पाहिजे, बोधीसत्त्व आपल्या जीवनामध्ये जन्मोजन्मी पवित्र बनत जातो व त्याचे अनुकरण कराणार्याचे रक्षण करतो. परंतु अवतारवादामध्ये ईश्वराच्या अवताराची जडणघडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणी संकल्पनेचा अर्थ इतकाच की, ईश्वर निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. परंतु बोधीसत्वाच्या बाबतीत मात्र तसे नाही, बुध्द बनण्यासाठी बोधीसत्वाला (किमान) सलग दहा जन्मांपर्यंत सर्वोच्च शुध्द जीवनाचे बंधन घालण्यात अाले आहे. बोधीसत्वाने अनेक जन्मांपर्यंत, बुध्दत्वाच्या प्राप्तीसाठी आवश्यक अशा शुध्द जीवन अवस्थेतुनच गेले पाहिजे. ह्या सिध्दांताला दुसऱ्या कोणत्याही शासनामध्ये तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या शास्त्याला अशा प्रकारच्या कसोटीला पूर्ण करण्याचे आव्हान देत नाही.
- दि बुध्द अॅण्ड हिज धम्म (१:४:४)
हे सर्व असतांना लेखक बाबासाहेबांच्या नावावर जातक कथांचा अपप्रचार का करू पाहतात हे कळायला मार्ग नाही.
२. लेखक म्हणतात, बुद्धांचा जन्म चमत्कारिक दाखविण्यात आलेला आहे. त्यानुसार "सुमेध बोधिसत्व हा महामायेच्या स्वप्नात येतो" याठिकाणी सुमेध हा बोधीसत्त्व होता हे लिखाण करणाऱ्याला कसे काय समजले असा ते प्रश्न करीत आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी सम्राट असलेल्या शुद्धोधनाने ब्राह्मण जोतीषांना बोलाविले यामध्ये त्यांना शंका येते. ह्या सर्व गोष्टी बुध्द चरित्रामध्ये भेसळ केल्या गेल्या आहेत असा त्यांचा दावा आहे. याठिकाणी बुध्द आणि त्यांचा धम्म मधील संदर्भ आपल्याला अधिक महत्वाचे ठरतील.
१०. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रगट झाला व तिला म्हणाला, "मी माझा पृथ्वीवर शेवटचा जन्म घेण्याचे ठरविले आहे, तू माझी माता होशील काय..?
११. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुधोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिध्द आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले.
- बुध्द आणि त्यांचा धम्म (१:१:३:१०-११)
![]() |
| महामायेचे स्वप्न |
३. जन्माबरोबर सात पावले टाकण्याची घटना रूपक होऊ शकत नाही का..? जिथे छोटा बोधिसत्व म्हणतो ह्या जगामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ मी दुसऱ्या कोणाला पाहत नाहीं, ही घटना कदाचित कवीची कल्पना असेल किंवा नसेलही पण त्याद्वारे त्यांनी योग्यप्रकारे बौध्द मत मांडले आहे. पुढे लेखक म्हणतात, संबोधि प्राप्त झाल्यावर देवांनी आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली असल्याचा चमत्कार घुसडविण्यात आलेला आहे. माझ्या अर्थानुसार ह्या संदर्भाला सुध्दा वरील सिद्धांत लागू होतो. पण जेव्हा छोट्या बोधीसत्वाचा जन्म होतो त्यावेळी,
३. असित ऋषीने पाहिले कि, अंतरिक्षातील देव "बुध्द" ह्या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्याने पाहिले कि ते आपली वस्त्राभूषणे मिरवत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत.
- बुध्द आणि त्यांचा धम्म (१:१:४:३)
![]() |
| असितामुनी शुध्दोधनाच्या दरबारात |
याचा अर्थ अन्तरिक्षामध्ये देव अस्तित्वात असतात हे बाबासाहेबांना मान्य होते असा होत नाही का...?
याठिकाणी असित ऋषी सुध्दा भविष्यवाणी करतो कि हा बालक बुध्द होणार आहे. पण त्यांची शिकवण ग्रहण करण्यासाठी ते जिवंत असणार नाहीत, त्यामुळे ते रडतात. येथे पहा, भगवान बुद्धांच्या धम्म शासनाचे अस्तित्व किती दुर्लभ आहे, त्यांचे धम्म उपदेश श्रवण करायला किती दुर्मिळ आहे, हे आपल्याला येथून जाणवते पण आपण तो बोध न घेता त्याला भलत्याच मार्गावर घेऊन जातो, बुध्द शासनाच्या अस्तित्वाचा लाभ न घेता आपण त्यावर टीका टिप्पणी करण्यातच आपला अनेक गुणांनी युक्त असा लाभायला अत्यंत दुर्मिळ मानव जन्म व्यर्थ घालवीत आहोत.
३. लेखक पुढे ब्रह्म सहम्पती वर टीका करतात. ब्रह्म सहम्पतीच्या बाबत बाबासाहेब लिहितात,
१०. चिंताग्रस्त असा ब्रह्म सहम्पती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धांच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नित सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला,
४. ब्रह्म सहम्पती सुवार्ता जाहीर करतो, जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी भांडणाऱ्यानो, न्यायासाठी तळमळणाऱ्या लोकांनो, या शुभावार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भूकेलेल्यांनो आता पोटभर खा, थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे ....
- बुध्द आणि त्यांचा धम्म (२:१:१:१० आणि २:१:२:४)
![]() |
| ब्रह्म सहम्पती भगवान बुद्धांची वंदना करतांना |
वरील ब्रह्म सहम्पती च्या बाबतीत धम्माला योग्य प्रकारे जाणल्या शिवाय ते नेमके काय प्रकरण आहे ते समजणार नाही. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न न करता वरवर केवळ स्वतःच्या मर्यादित बुद्धीच्या आधारेच त्या गोष्टी पटत नाही, म्हणून नाकारणे अधिकच गैरसमजांना खतपाणी घालतील आणि बुद्धांचा धम्म इतका व्यापक आहे कि, त्यामुळे तुम्हाला धम्माच्या सारालाच मुकावे लागेल.
५. भगवान बुध्द हे काही स्वर्गातून बुध्द म्हणून अवतरले नाही, त्यापूर्वी ते आपल्या सारखेच सामान्य मानव होते ज्यांनी बुद्ध्त्वाची प्राप्ती केली. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याने कोणत्याही मनुष्यासाठी ते पद - ती अवस्था प्राप्त करणे शक्य आहे. त्यामुळे भगवान बुध्द इस्लामच्या शेवटच्या प्रेषितांच्या प्रमाणे असा दावा करीत नाहीत कि मी शेवटचा आहे आणि माझ्या नंतर दुसरा कोणी येणार नाही. याउलट भगवान बुद्धांचे म्हणणे आहे कि, ह्या जगातील प्रत्येक जीवाकडे बुध्दाचा स्वभाव आहे, आणि प्रत्येक जीव बुध्द होण्याची क्षमता राखतो, त्यामुळे माझा पूर्वी सुध्दा अनेक बुध्द होऊन गेली आहेत आणि नंतरही अनेक बुध्द होतील.. अर्थात जे काही अनेक बुध्द सांगितले जातात ते एकाच बुध्दाचे अनेक अवतार नसून विविध बोधिसत्व आहेत ज्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतली. बौध्द धम्मानुसार जेव्हा ह्या जगामध्ये बुद्धांचे आणि त्यांच्या श्रावकांसाठी त्यांच्या धम्माचे अस्तित्व राहत नाहीत, त्यावेळी बुद्धांचे उत्पन्न होणे असते. सर्व बुध्द हे कोणत्याही गुरुच्या मदतीविना स्वयंप्रयत्नाने बुध्दत्वाची प्राप्ती करीत असतात. (ना में आचारियो अत्थी) धम्माचा अर्थात निसर्गाच्या नियमांचा उपदेश करीत असतात. आता निसर्गाचे नियम तर सारखेच असतील त्यामुळे सर्व बुद्धांची शिकवण सुध्दा सारखीच असते, याचा अर्थ त्यांनी एकमेकांची शिकवण चोरली असा अर्थ कोणी का लावावा..? सर्व बुद्धांच्या बळांच्या बाबतीत आटानाटिय सुत्तामध्ये वर्णन केले आहे, ते या प्रमाणे :
उपरोक्त सम्यक संबुद्धों के अतिरिक्त जो अनेक शत कोटी सम्यक संबुद्ध हुए है वे अन्य किसी कि तुलना में अ-सम हैं, महान हैं ; परंतु पारस्पारिक तुलना में सभी सम हैं,सभी विपुल ऋद्धीशाली हैं ॥७॥
सभी बुध्द दस बलशाली होते हैं, सभी वैशारद्य प्राप्त भयमुक्त होते हैं, वे सभी परमार्षभ याने परमोत्तम स्थान को प्राप्त स्वीकार करते हैं ॥८॥
ये सभी सिंहनाद सदृश देशना द्वारा संपूर्ण परिषद को निर्भय कर देते हैं और ऎसे ब्रह्मचक्र (धर्मचक्र) का प्रवर्तन करतके हैं, जिसका कि समस्त लोक में कोई भी प्राणी उलटा प्रवर्तन नहीं कर सकता ॥९॥
ये सभी लोक नायक अठ्ठारह बुध्द गुण धर्मों से युक्त हैं,महापुरुषों के बत्तीस प्रमुख लक्षणों और अस्सी अनुव्यंजनों को धारण करणे वाले हैं ॥१०॥
ये सभी मुनी श्रेष्ठ ब्यामप्रभा से प्रभान्वित होते हैं ये सभी बुध्द सर्वज्ञ होते हैं और क्षीण आस्रव जन होते हैं ॥११॥
ये सभी बुध्द महाप्रभावान, महातेजस्वी, महाप्रज्ञावान,महाबलशाली, महाकारुणिक, पंडित और सभी प्राणीयों के लिये सुख लानेवाले हैं ॥१२॥
ये सभी बुध्द, डुबते हुये के लिये द्वीप, अनाथों के नाथ,निराधारों के आधार, त्राणराहितों के त्राण, निरालयों के आलय, अगतीवानों कि गती, बन्धुहीनों के बंधू, निराश लोगों कि आशा, अशरणों कि शरण और सब के हितैषी हैं ॥१३॥
६. लेखक पुढे म्हणतात की, जातक कथा बाबासाहेबांना पटत नाहीत. हे ते कोणत्या आधारावर म्हणतात हे मला माहित नाही. परंतु जातक कथांच्या बाबतीत बाबासाहेबांचे मत प्रदर्शित करणारे विधान मी वर संदर्भासहित दिलेले आहे, आपण सर्वांनी त्यावर विचार करावा.
७. भगवान बुध्द आत्मा मानीत नाहीत परंतु पुनर्जन्म मानतात, त्यांच्या ह्या आत्म्याविना होणाऱ्या पुनर्जन्माच्या मान्यतेच्या मुळामध्ये प्रतीत्य समुत्पाद नावाचा महान सिद्धांत आहे, त्याला आपण योग्यप्रकारे समजून घ्यायला हवे, त्याच्या बारा साखळ्या समजून घ्यायला हव्यात. कोणत्याही जीवाच्या जन्मासाठी नाम (mind) - रूप (matter) कारणीभूत ठरतात (आणि नाम रूपांच्या निर्मितीसाठी इतर कारक कारणीभूत ठरतात, अविद्या सर्वाचे मूळ आहे)
८. भगवान बुद्धांनी कालाम सुत्ता मध्ये म्हटले आहे,
एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय,मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा,अत्तनाव जानेय्याथ – ‘इमे धम्मा अकुसला,इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे,कालामा, पजहेय्याथ।
१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
३. हि गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.
८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका....
तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले,आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.
याठिकाणी भगवान बुध्द कालामांना तर्काप्रामान्यवाद सोडून अनुभूतीच्या आधारे सत्य जाणण्याचा उपदेश करतात. कारण तर्काच्या आधारे कोणीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीचे तर्क हे त्याच्या बुद्धीप्रमाणे मर्यादित असतील. परंतु अनुभूती मात्र सत्याचीच होईल. भगवान बुद्धांनी किंवा नंतर त्यांच्या शिष्यांनी जे काही अनुभव केले ते त्यांच्या धम्म उपदेशांच्या आधारे सर्व जगाला सांगितले. ते उपदेश सत्य आहेत किंवा असत्य हे अनुभूतीच्या आधारे तपासून घेण्यासाठी त्यांनी मार्ग सुध्दा सांगितलेला आहे. कारण भगवान म्हणतात "एहीपास्सिको" अर्थात या आणि पहा, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका तर मी जे काही सांगतो ते तुमच्या अनुभूतीच्या आधारे तपासून बघा. (तर्काच्या आधारे सत्य तपासले जाऊ शकत नाही, कारण कोणताही जीव त्याच्या मर्यादित विचारशक्ती प्रमाणेच विचार करू शकतो, त्यामुळे त्याच्या बुद्धीची जिथपर्यंत मर्यादा आहे, तिथपर्यंतच तो विचार करू शकतो)
तर अन्तरिक्षामध्ये देव आहेत किंवा नाही ह्या वायफळ शोधामध्ये आपला अमुल्य वेळ व्यर्थ घालविणे हा बुद्धांचा धम्म नाही, तर निर्वाण प्राप्त करून घेणे आहे आहे. निर्वाण प्राप्तीच्या हा मार्गावर पुढे जात असतांना आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतील. अनेक बळ प्राप्त होईल - अदृश्य जीवांना पाहू शकण्याचे बळ, सामान्यांना ऐकू येऊ न शकणाऱ्या ध्वनीला ऐकण्याचे बळ याप्रमाणे. पण ह्या सर्वांना प्राप्त करणे हे बौध्द धम्माचे ध्येय नाही, तर केवळ निर्वाण प्राप्त करणे हे एकमेव व अंतिम ध्येय आहे., त्यामुळे बौध्द धम्मातील जी मते आपल्या (मर्यादित) बुद्धीला पटत नसतील ती सर्व असत्य मानून त्यांना नाकारणे किंवा त्यांच्या बाबत नकारात्मक प्रचार करणे अत्यंत चुकीचे आहे. ज्याअर्थी तुम्ही एखाद्या सिद्धांताला स्वीकारू शकत नसले तर त्याला नाकारू सुध्दा नका. देव आहेत का, पुनर्जन्म आहे का किंवा नाही, इत्यादी सर्व व्यर्थ प्रश्न आहेत. बौध्द धम्माच्या दृष्टीने त्यांच्या संशोधनाला काहीच महत्व नाही, ते तर केवळ निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर चालत असतांना आलेले अनुभव आहेत., ज्यांचा अनुभव प्रत्येक व्यक्तीद्वारे केला जाऊ शकतो असा त्यांचा दावा आहे. शेवटी भगवान बुद्धांच्या धम्माचे एकच सार आहे,
कोणत्याही प्रकारचे पाप न करणे, कुशल कर्मांचे संपादन करणे, स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे, हेच बुद्धांचे शासन आहे...
![]() |
| सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा... |
- Get link
- X
- Other Apps




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा